महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही….?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकापेक्षा अधिक वेळा आमदार झालेल्या प्रत्येकालाच मंत्री व्हावं असं वाटत असतं. दीर्घकाळ मंत्रीपदावर असलेल्या प्रत्येकाला आपण आता मुख्यमंत्री(Chief Minister) व्हायला पाहिजे असं त्यांचं त्यांना मन सांगत असतं. आपली ही इच्छा प्रत्येक जण उघडपणे सांगतोच असं नाही. काहीजण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या महत्त्वाच्या विषयावर व्यक्त होत असतात.

विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि ते अधून मधून तसं उघडपणे बोलतही असतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मी एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री(Chief Minister) नक्की होणार असं आपल्या मनीचं सांगून टाकलंय आणि त्यात वावगे म्हणावे असे काहीच नाही. ते महत्त्वकांक्षी नेते आहेत, त्यांनी आपली महत्त्वकांक्षा सांगून टाकली इतकेच.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अजित दादांना राजकारणात ज्युनिअर आहेत. पण हे दोघेही मुख्यमंत्री फडणवीस हे तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. तिसऱ्यांदा मी मुख्यमंत्री बनलो त्याची बीजे पहाटेच्या शपथविधीत रुजली होती असे सांगून त्यांनी सर्वांनाच आता कोड्यात टाकले आहे. शिंदे हे सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन मुख्यमंत्री बनले होते. अजित दादा यांनी तर “माझ्यानंतर आले आणि मुख्यमंत्री बनले” अशी खंत की खदखद पूर्वीच बोलून दाखवली आहे.

आता त्यांनी मला सुद्धा एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे असे जाहीरपणे सांगितले आणि त्यात हरकत घ्यावी असे काहीच नाही.
मक्खी महत्त्वाकांक्षा बाळगून, ती वेळोवेळी बोलून दाखवून पक्षप्रमुखाला पक्ष वाढवायचा असतो. पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबवून ठेवावयाचे असते. आउटगोइंग होऊ द्यायचे नसते. इनकमिंग वाढवायचे असते. पक्षप्रमुखाकडे महत्त्वकांच्या नसेल तर पक्षाला गळती लागते.. आपला नेता आज ना उद्या मुख्यमंत्री होईल, मग त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ आपल्यालाही मिळतील अशी अपेक्षा असलेले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा मग विचार करत नाहीत. कार्यकर्त्यांची ही नस अजितदादांना माहित आहे आणि म्हणूनच ते आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत असतात.

मला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री(Chief Minister) व्हायचे आहे असे अजितदादा यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेले असले तरी ते महायुती मधून बाहेर पडणार आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध बंड करणार आहेत असेही म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री व्हावयाचे असेल तर विधानसभेत पुरेसे संख्याबळ असावे लागते. अर्थात तेवढे संख्याबळ अजितदादा यांच्याकडे अजिबात नाही.

तथापि गेल्या काही महिन्यांपासून अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढले आहे. दोनच दिवसापूर्वी शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री आणि एक माजी आमदार असे तिघेजण अजित दादा पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे समजले जाते. सध्या अजितदादा पवार गटाकडे आमदारांचे जेवढे संख्याबळ आहे त्यापेक्षा दुप्पट संख्याबळ करण्यासाठी पक्षांमध्ये निवडून येण्याची गुणवत्ता असलेल्या कार्यकर्त्यांचे इनकमिंग मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजे यासाठी अजितदादा हे आत्तापासूनच प्रयत्नला लागलेले दिसतात.

त्यांच्याकडे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू आहे. हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे शरद पवार हे उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत देऊ लागले आहेत, तथापि त्यांच्या गटातून आउटगोइंग असेच सुरू राहिल्यास फिरवण्यासाठी भाकरीच हातात राहणार नाही.

अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी चे आमदारांचे संख्याबळ 2029 च्या विधानसभा निवडणुकीत दुप्पट झाले तरी ते मुख्यमंत्री होणार नाहीत. काही राजकीय चमत्कार झालाच तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. सध्या तरी त्यांचे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असे सांगणे म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यातला प्रयत्न म्हणावा लागेल.

हेही वाचा :

‘या’ तारखेला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी धावणार नाही; राज्यव्यापी बंदची हाक

छोटा दत्तू मोरे आला होsss ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी

इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार; दुपारी १ वाजता निकाल, ‘या’ संकेस्थळावर पाहा