कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहलगाम दहशतकांड होऊन आठ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा देश सहभागी झाला आहे(army). जगातील बहुतांशी देशांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पाकच्या विरोधात काही निर्णय घेतले गेले आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यात यावा अशी एकमुखी मागणी सातत्याने होते आहे.

केंद्र शासनाने लष्कराच्या(army) तिन्ही दलांना कारवाईचे सर्व अधिकार बहाल केले आहेत. दिवस, वेळ आणि लक्ष्य निवडण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लष्कराच्या प्रत्यक्ष कृतीकडे लागले आहे. सध्या तरी पाकिस्तानला भीतीच्या गडद छायेत आणण्यात भारताचे प्रयत्न यशस्वी ठरले असल्याचे चित्र दिसते आहे.
सिंधू नदीत भारतीयांचे रक्त वाहिल अशी वल्गना करणाऱ्या बिलावल भुत्तो याने स्वतःच्या कुटुंबीयांना परदेशात सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. पाहायला राम दर्शन घडवण्यासाठी ज्यांनी फूस दिली ते लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना खाजगी विमानाने परदेशात पाठवले आहे. याचा अर्थ ही सर्व मंडळी आतून घाबरलेली आहेत. भारत हल्ला करणार हे पाक ने गृहीत धरले आहे.
युद्धाच्या सावटाखाली असलेल्या पाकमध्ये राजकीय वातावरण अस्थिर आहे. लष्करातील एक गट लष्कर प्रमुख मुनीर यांच्यावर कमालीचा नाराज आहे. मुनीर यांना लष्कर(army) प्रमुख पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी या गटाची आहे. पाक मधील अस्वस्थ वातावरणाचा लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून सरकार उलथवून टाकण्यासाठी फायदा घेतला जाईल अशीही चर्चा सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सर्व बाजूंनी अडचणीत आलेल्या, जगायचं कसं अशी विवंचना असलेल्या पाकिस्तानच्या सामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी युद्धसदृश्य स्थितीचा फायदा सत्ताधाऱ्यांच्याकडून घेतला जाईल.
भारतामध्ये मात्र नेमके उलटी स्थिती आहे. लोकांना सर्जिकल स्ट्राइक किंवा मर्यादित युद्ध नको आहे. आरपारची लढाई अपेक्षित आहे. पाकिस्तानचा आणखी एक तुकडा या निमित्ताने पाडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, पाक व्यक्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे आणि बलुचिस्तान पाक पासून वेगळा करण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत. असे प्रत्येक भारतीयाला मनापासून वाटते आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तर गेल्या काही महिन्यांपासून पाक व्याप्त काश्मीर कोणत्याही क्षणी भारतात सामील होईल, तेथील सर्वसामान्य जनता त्यासाठी उत्सुक आहे असे सांगत आहेत. त्यामुळे पीओके ताब्यात घेण्यासाठी पहलगाम दहशतकांडामुळे चांगली संधी प्राप्त झाली आहे. पीओके काबीज करण्याचा प्रयत्न झाला तर बलुची लोकही पाक विरुद्ध उठाव करतील. त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते सैरभैर होतील. देशभर गोंधळाची स्थिती निर्माण होईल. हे सर्व घडवून आणण्यासाठी आता देशवासीयांना लष्कराच्या(army) तिन्ही दलांकडून ॲक्शन हवी आहे. आणि त्यासाठी केंद्र शासनावरही दबाव येतो आहे, आला आहे.
केंद्र शासनाकडून पाकिस्तान विरोधी जी कारवाई होईल त्याला देशातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
सर्वसामान्य जनता, राजकीय पक्षांचे नेते आणि केंद्र शासन यांच्यात एकवाक्यता आहे. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेलाही आता पाकिस्तान विरुद्ध कारवाई अपेक्षित आहे. ओमर अब्दुल्ला सरकारने पाकिस्तान विरोधी कठोर भूमिका घेतली आहे. फुटीर प्रवृत्ती पासून दूर राहण्याचे आवाहन काश्मीरमधील काही संघटनांनी सर्वसामान्य जनतेला केले आहे. हे सर्व पहिल्यांदा घडते आहे.
ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना मात्र पहलगाम घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात मिलिटरी ॲक्शन अपेक्षित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो कायदेशीर स्ट्राइक केला आहे तो फारसा महत्त्वाचा नाही. असे त्यांना म्हणावयाचे आहे.
कायदेशीर स्ट्राइक आणि प्रत्यक्ष बदला या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असे ते म्हणतात. त्यांना सर्व गोष्टी सहज आणि सोप्या वाटतात असे दिसते. परिपूर्ण नियोजन केल्याशिवाय तसेच बहुतांशी देशांना विश्वासात घेतल्याशिवाय, लष्करी कारवाई करणे कठीण असते हे त्यांना माहीत नसावे.
नवी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही प्रमुख देशांच्या प्रमुखांशी संवाद सुरू केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 100 पेक्षा अधिक राजदूतांना विश्वासात घेऊन उद्भवलेल्या परिस्थितीचे कथन केले आहे. पाकिस्तान विरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर या देशांचा पाठिंबा भारताला मिळाला पाहिजे असे प्रयत्न सुरू आहेत.
एकूणच केंद्र शासनाच्या हालचाली एकाच वेळी अनेक पातळीवर सुरू आहेत. हे एकीकडे सुरू असतानाच पहलगाम येथे पर्यटकांच्यावर जो हल्ला झाला, त्यामागे पाक पुरस्कृत दहशतवादी आहेत याबद्दलचे पुरावे गोळा करण्याचे काम एन आय ए कडून सुरू आहे. एन आय ए चे प्रमुख सदानंद दाते हे त्यासाठीच पहेलगामच्या दौऱ्यावर आहेत. उपलब्ध झालेले पुरावे जगासमोर आणले जाणार आहेत. आणि त्यातून पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य
उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
पुढच्या वर्षीही IPL खेळणार? CSK च्या कर्णधाराचे हसत-हसत उत्तर