कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सिंधू पाणी वाटप कराराला दिलेली एकतर्फी स्थगिती, सर्व प्रकारचा व्यापार बंद करून केलेली आर्थिक कोंडी, जागतिक पटलावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी वापरलेली कूट नीती, आम्ही कधीही कुठेही आर पार ची लढाई करू शकतो असं तयार केलेलं वातावरण, याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या मानसिक धैर्यावर झालेला प्रतिकूल परिणाम. त्यातून गोंधळलेल्या पाकच्या नापाक राज्यकर्त्यांकडून शिमला करार रद्द करण्याची झालेली भयंकर चूक आणि या चुकीचा भारताच्या हवाई दलाने घेतलेला फायदा म्हणजे “ऑपरेशन सिंदूर”(Operation Sindoor) होय.

मंगळवार ते बुधवार दरम्यानच्या मध्यरात्री भारताने एअर स्ट्राइक करून पार्कला धडकी भरवली, शिवाय भारताच्या लष्करी सामर्थ्याचे जगाला दर्शनी घडवले. विशेष म्हणजे पाकिस्तान वगळता आशियाई खंडातील तसेच जगातील अनेक देशांनी भारताच्या या एअर स्ट्राइक चे समर्थन केले आहे. हे एक प्रकारचे भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे यश आहे असे म्हटले पाहिजे.
पहेलगाम येथे दिनांक 22 एप्रिल रोजी भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आले आणि तेही त्यांच्या पत्नीसमोर. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या सौभाग्यवतींच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याची क्रूरता दाखवली. म्हणून या एअर स्ट्राइकला ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. हे ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्याबद्दलची पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
लष्करातील दोन महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर ची माहिती दिली. या दोन पैकी एक अधिकारी महिला मुस्लिम होती. लष्करी शिस्तीत आम्ही धर्म आणत नाही तसेच स्त्रीला आम्ही नारीशक्ती म्हणून सन्मान देतो असा एक संदेश या निमित्ताने जगाला दिला गेला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला करताना आणि करण्यापूर्वी भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी तंत्राचा आणि कूट नीतीचा वापर केला आहे.
शत्रूला कायम दहशतीच्या गडद छायेखाली आणून ठेवणे, त्याला सतत तणावात ठेवणे, मानसिक खच्ची करणे, आणि त्याच्याकडून भयंकर चूक घडवून आणणे ही छत्रपती शिवरायांची नीती ह्या ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरली गेली आहे. सिंधू पाणी वाटप करार भारताने एकतर्फी स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने शिमला करार मोडीत काढला. द्विपक्षीय करार संपुष्टात आणला. या करारा अंतर्गत दोन देशांमध्ये नियंत्रण रेषा आणली. या नियंत्रण रेषेचा भंग करायचा नाही अशी अट या करारात होती. पाकिस्तानाने हा करारच खंडित केल्यामुळे भारताने त्याचा ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) करताना घेतला. करार मोडल्यामुळे नियंत्रण रेषा राहिली नाही, त्यामुळे नियंत्रण रेषेचा भंग केला असा आरोप आता पाकिस्तानला भारतावर ठेवता येणार नाही.
पहलगाम येथे भारतीय पर्यटकांच्यावर पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला. 26 पेक्षा अधिक पर्यटकांना गोळ्या झाडून मारले. याची गंभीर दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली होती. अशा प्रकारे दहशतवाद करणाऱ्यांना, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवणाऱ्यांना,
त्यांच्या भ्याड हल्ल्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा आशयाचे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुखांनी व्यक्त केले होते. अशा प्रकारची शिक्षा देण्याचे नैतिक स्वातंत्र्य भारताला असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुखांनी सांगितले होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुखाचे मत भारताला पथ्यावर पडले. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रमुखांच्या मनात जे आहे तेच आम्ही करून दाखवले आहे असे भारताने सुचित केले आहे.

भाग व्याप्त काश्मीरमधील पाच आणि पाकिस्तान मधील चार अशा एकूण नऊ दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाने हल्ले केले. जैश ए मोहम्मद, हिजबुल आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांवर हे हवाई हल्ले करून ते नष्ट करण्यात आले. किमान शंभर दहशतवादी त्यामध्ये मारले गेले असावेत असा अंदाज आहे. विशेष म्हणजे भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला मसूद अजहर याचे संपूर्ण कुटुंब या हल्ल्यात ठार झाले आहे. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते अशी हतबल प्रतिक्रिया मसुदने दिली आहे.
निष्पाप लोकांना मारल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना किती दुःख झाले असेल याची कल्पना या क्रूर कर्मा असलेल्या मसुदला आली असेल. किंबहुना नीयतीने त्याचा न्याय केला असे म्हणता येईल. एकीकडे कायदेशीर स्ट्राइकच्या गुंत्यामध्ये पाकला
अडकवताना, मिळालेल्या वेळेचा भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांना ऑपरेशन सिंदूर चे नियोजन करता आले. पहेलगाम हल्ल्यानंतर त्याचा घरात घुसून बदला घेतला जाईल असा इशारा भारताने दिला होता.
काही दिवस पाक व्याप्त काश्मीर मधील आणि पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे मुख्यालय शोधून काढण्याचे अतिशय जोखमीचे काम भारतीय लष्कराने केले. दहशतवाद्यांच्या मुख्यालयांची अचूक माहिती संकलित करण्यात आली. ठिकाणी अचूकपणे शोधण्यात आली आणि नंतर राफेल विमानांच्या मदतीने एयर स्ट्राइक करण्यात आला. विशेष म्हणजे हा स्ट्राइक अवघ्या 20 मिनिटांमध्ये उरकण्यात आला. यामध्ये भारताची मनुष्यहानी झाली नाही. राफेल विमानाचे पायलट सुखरूपपणे भारतात परतले. अगदी कमीत कमी वेळा त जास्तीत जास्त नुकसान करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि ते पूर्ण करण्यात आले.
बुधवारी देशातील 295 जिल्ह्यामध्ये, (महाराष्ट्रातील 16 जिल्हे) युद्ध सरावाचा एक भाग म्हणून, लोकसहभागातून मॉक ड्रिल घेण्यात आले. त्याची घोषणा सोमवारी करण्यात आली होती. भारत तात्काळ हल्ला करणार नाही अशी पाकिस्तानची मानसिकता तयार करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता. देशातील काही वाचाळ वीरांनी, भारत पाकिस्तान वर हल्ला का करत नाही असा सवाल उपस्थित केला होता. काँग्रेसच्या एका नेत्यांने तर राफेल विमानाच्या प्रतिकृतीला मिरच्या आणि लिंबू अडकवला होता. भारतीय लष्कराची एक प्रकारे कुचेष्टा करण्याचा हा प्रयत्न होता.
आता या वाचाळ वीरांना एक प्रकारची चपराक बसली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवून केंद्रशासनाबरोबर आहोत असे सांगणाऱ्यापैकी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे एक होते. पण त्यांनीच पहलगाम हल्ला होणार हे नरेंद्र मोदी यांना तीन दिवस आधीच माहीत होते असा गंभीर आरोप करून काय मिळवले हे कळावयास मार्ग नाही.
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान मध्ये घुसून एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे राज्यकर्ते बावचळून गेले आहेत. त्यांनी भारतीय राजदूताला याबद्दल समन्स पाठवून संतापाची प्रतिक्रिया कळवली आहे. यापूर्वी पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने अद्याप तरी भारताच्या एअर स्ट्राइक ला प्रतिउत्तर दिलेले नाही. आणि भारतानेही ऑपरेशन सिंदूर म्हणजे पूर्णविराम नाही असे सुचित केले आहे. अद्याप तरी विठ्ठला तोंड फुटलेले नाही, पण ते होणारच नाही असेही म्हणता येणार नाही.
हेही वाचा :
लग्नाच्या 7 वर्षांनंतर अनुभवलं मातृत्व, सागरिका घाटगेने शेअर केले फोटो
ईडन गार्डन्सवर आज घमासान! धोनी आर्मी करणार KKR सोबत दोन हात..
वाइन, चॉकलेट, बिस्किटे…, मुक्त व्यापारामुळे ‘या’ वस्तू होणार स्वस्त; दोन्ही देशांमधील करार काय होता?