‘बॉलिवूडला अंडरवर्ल्डमधूनच…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट

बॉलिवूड(Bollywood) आणि गुन्हेगारी जगतातील संबंध हा काही नवीन विषय नाही. अनेक दशकांपासून याबद्दल चर्चा होत आली आहे. एक काळ असा होता, जेव्हा अनेक बॉलिवूड कलाकारांचे थेट संबंध अंडरवर्ल्डशी जोडले गेले होते. काहींनी ते उघडपणे स्वीकारले, तर काहींनी नेहमीच नाकारले. बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जात होता, यावरही अनेकदा चर्चा झाली आहे. आता नव्वदच्या दशकात ‘आशिकी’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री अनु अग्रवालने एक मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे.

अनु अग्रवालने त्यावेळच्या बॉलिवूड(Bollywood) आणि गुन्हेगारी जगतातील कथित संबंधांवर भाष्य केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत अंडरवर्ल्डचा खूप मोठा हस्तक्षेप होता. त्या काळात चित्रपटांचा व्यवसाय कशा प्रकारे चालत होता, याबद्दल तिने अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. अनु अग्रवालने स्पष्टपणे सांगितले की, नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आणि गुन्हेगारी जगतात खूप जवळचे संबंध होते.

बहुतेक चित्रपटांचे आर्थिक व्यवहार कागदोपत्री दाखवले जात नव्हते, म्हणजेच ‘ऑफ-द-रेकॉर्ड’ व्हायचे. यामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांचा मोठा सहभाग होता, असे बोलले जाते. अनु अग्रवालने थेट विधान केले की, “सारा पैसा अंडरवर्ल्ड से आता था”, म्हणजेच त्या काळात बहुतेक पैसा अंडरवर्ल्डमधूनच येत होता.

तिने पुढे सांगितले की, त्या काळात अंडरवर्ल्डचा चित्रपटांवर प्रचंड दबाव होता. निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या मर्जीनुसार काम करत असत. यामुळे अनेक कलाकारांना मानसिक आणि व्यावसायिक त्रास सहन करावा लागला. अनु अग्रवालने स्पष्ट केले की, तिच्याकडे त्यावेळच्या गोष्टींचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु तिने स्वतः अनुभवलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टी ती सांगत आहे.

अनु अग्रवालने तिच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना सांगितले की, ‘आशिकी’च्या प्रचंड यशानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या जीवाला धोका होता. अनेक चाहते तिच्या इमारतीबाहेर तासन्तास थांबायचे. काहीजण तर परदेशातून तिला भेटायला येत होते. ती एका उच्च सुरक्षा असलेल्या व्हीआयपी इमारतीत राहायची, जिथे पोलिसांची सुरक्षा असूनही अनेक विचित्र गोष्टी घडायच्या. ‘आशिकी’च्या अभूतपूर्व यशानंतर अनु अग्रवाल एका रात्रीत स्टार बनली, पण या प्रसिद्धीमुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याच काळात ती अचानक चित्रपटांपासून आणि इंडस्ट्रीपासून दूर गेली.

अनु अग्रवालने त्यावेळच्या परिस्थितीची तुलना अभिनेता शाहरुख खानला मिळणाऱ्या प्रसिद्धीशी केली. ती म्हणाली की, तेव्हा ती शाहरुख खानच्या शेजारी राहत होती. ‘आशिकी’नंतर अनु अग्रवालने ‘गजब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले, पण १९९९ मध्ये एका गंभीर कार अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचे यशस्वी करिअर अकाली थांबले. आता अनेक वर्षांनंतर तिने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डच्या कथित संबंधांवर केलेले हे धक्कादायक खुलासे निश्चितच खळबळ माजवणारे आहेत.

हेही वाचा :

उद्यापासून सुरु होणार गुगलचा सर्वात मोठा ईव्हेंट! 

 “मुंबई बॉम्बस्फोटांनी उद्ध्वस्त…” मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाचा फोन, पोलिस सतर्क

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत…? कसला आनंदोत्सव….? प्रकाश आंबेडकरांचे खरमरीत टीकास्त्र