इचलकरंजी – इचलकरंजीतील श्रध्दा अकॅडमीत(Academy) आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणानंतर एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे रवींद्र रणभिसे यांनी माध्यमांसमोर येत त्यांच्या मुलालाही याच अकॅडमीत मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

रणभिसे म्हणाले, “माझा मुलगा प्रणव रणभिसे याने इयत्ता ११ वीमध्ये आप्पासाहेब तांबे यांच्या अकॅडमीत प्रवेश घेतला होता. जाहिरातबाजीवर विश्वास ठेवून आम्ही शैक्षणिक गुणवत्तेच्या अपेक्षेने प्रवेश घेतला. अकॅडमीसाठी ९० हजार आणि होस्टेल-मेससाठी ९० हजार असे एकूण १ लाख ८० हजार भरले. दोन वर्षांसाठी एकूण ३ लाख ६० हजार रुपये दिले. मात्र, सहा महिन्यांनंतरच व्यवस्थापनाने मुलाच्या छळाला सुरुवात केली.”
त्यांनी पुढे सांगितले, “तांबे सरांचे पुत्र अभिषेक, सून सृष्टी आणि व्यवस्थापन प्रमुख सुप्रिया कौंदाडे यांनी माझ्या मुलाला वेळोवेळी मारहाण केली. एकदा तो केस कापायला सलूनमध्ये गेला असता, तिथेच अभिषेक आणि सृष्टी तांबे आले. त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ करत धमकावलं. नंतर अकॅडमीमध्ये(Academy) परतल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून मुलावर काठीने आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.”
रणभिसे यांनी दावा केला की, “मुलगाच फोन करून सांगत होता की, त्याला मानसिक त्रास दिला जात आहे. त्याला तेथून बाहेर काढा. हे समजल्यावर मी तात्काळ अकॅडमी गाठली, पण तिथं मला देखील धमकावण्यात आलं. यानंतर मुलाच्या जीवाची काळजी घेऊन मी त्याला तातडीने तिथून बाहेर काढलं. अन्यथा आज माझ्या मुलाचंही नशीब यश यादवसारखं झालं असतं.”
या गंभीर आरोपांमुळे श्रध्दा अकॅडमीत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वागणुकीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अभिभावकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
गावभागातील सर्व सरकारी शौचालये बनली अस्वच्छतेचे केंद्र – महिलांचा संताप, प्रशासनावर गंभीर आरोप
आजपासून शनिदेव ‘या’ 3 राशींच्या पाठीशी भक्कम, मीन राशीत चंद्राशी युती, श्रीमंतीचे संकेत
श्रध्दा अकॅडमीचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी